वाळवी: रहस्मय आणि हास्याचे एक ताजेतवाने मिश्रण

 


 प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट “वाळवी” हा एक अपवादात्मक डार्क -थ्रिलर कॉमेडी सिनेमा आहे.

या चित्रपटाची कथा प्रामुख्याने चार मुख्य पात्रांभोवती फिरते: अनिकेत (स्वप्नील जोशी), त्याची पत्नी अवनी (अनिता दाते - केळकर), अनिकेतची मैत्रीण देविका (शिवानी सुर्वे) आणि अनिकेतच्या बायकोचा मित्र सुबोध भावे.

अनिकेत पत्नी अवनीच्या त्रासाला कंटाळला आहे. त्याला तिच्याकडून घटस्फोट हवा आहे, पण ती त्याला घटस्फोट देण्यास नकार देते. अनिकेत या सर्व गोष्टींना कंटाळून त्याच्या मैत्रिणीसोबत स्वतःच्या बायकोला मारण्याचा एककट रचतो. पण त्यांनी ठरवल्याप्रमाणे पुढे काहीच होत नाही. या सर्व घटनाक्रमातून एक वेगळीच डार्क थ्रिलर कॉमेडी निर्माण होते. बरेचसे थरारक प्रसंग उत्कृष्ट विनोद निर्माण करतात व प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या चित्रपटामध्ये मोठ्या चतुराईने सस्पेन्स आणि कॉमेडीची सांगड घालण्यात आली आहे, ज्यामुळे चित्रपट पाहतांना एक अनोखा अनुभव येतो.



चित्रपटाचा खरा नायक हि त्याची मनमोहक कथा आहे, जी प्रेक्षकांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मोहित करते आणि गुंतवून ठेवते. सिनेमा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला काही वेळ प्रेक्षकांना चित्रपटातील मुख्य पत्रे आणि त्याच्या व्यक्तिमत्वा भोवतीच्या प्रेरणा समजून घेण्यात जातो. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात खऱ्या अर्थाने कथा चमकते. दुसऱ्या भागात कथानक एक विशिष्ठ वेग धारण करते, अधिकाधिक विनोदी बनत जाते व थरारक प्रसंगातून सर्वांना खेळवून ठेवते. चित्रपटाचे संपादन उल्लेखास पात्र आहे, कारण सिनेमात जीकाही जादू निर्माण झाली आहे त्यात संपादनाचा खूप मोठा वाटा आहे, किंबहुना असतो हे नाकारता येणार नाही. संपूर्ण सिनेमाभर कथानकाचे संतुलन राखण्यात संपादक यशस्वी झाला आहे.

दिग्दर्शकाने अनोख्या पद्धतीने कलाकारांच्या निवडी केल्या आहेत. या सिनेमातील सर्व कलाकारांनी त्यांच्या आजतागायतच्या साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या पूर्णपणे वेगळ्या, विरुद्ध भूमिका या सिनेमात साकारल्या आहेत. नेहमीप्रमाणेच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अनिता दाते - केळकरने तिची भूमिका चोख बजावली आहे तर शिवानी सुर्वेने तिच्या भूमिकेला एक वेगळेपण दिले आहे. आता पर्यंत परेश मोकाशी हे "एलिझाबेथ एकादशी" आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांसाठी ओळखले जातात पण त्यांनी “वाळवीच्या” रूपाने एक वेगळा प्रयत्न करण्याचे धाडस त्यांनी केले आहे.

"वाळवी" हे सिनेमाचे नाव वाचल्यानंतर साहजिकच असा प्रश्न पडतो कि, या चित्रपटाला "वाळवी" हे नाव का दिले असावे ? मराठी भाषेमध्ये  वाळवी लागणे किंवा घरघर लागणे अशी एक म्हण किंवा वाक्प्रचार आहे. तसेच वाळवी नावाचा एक कीटक प्राणी आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतो जो दिसायला पांढऱ्या मुंग्यांसारखा असतो. तो स्वतःच्या उपजीविकेसाठी कागद, कार्डबोर्ड, कापूस, लाकूड, फर्निचर अशा वास्तुवरती अवलंबून असतो कारण वनस्पती मधील सेल्युलोज हे वाळवीचे मुख्य अन्न आहे आणि ते त्याला मुखत्वे लाकडातून मिळते.



वाळवीला “उदई” असेही म्हटले जाते. या कीटकाची विशषतः  हि कि, एकदा का लाकडावरती किंवा लाकडाच्या वास्तुवरती हे कीटक बसले कि त्याला  रातोरात खाऊन- खाऊन फस्त करते. कधी - कधी वर - वर पाहता त्या वस्तू कडे पाहून लक्षात सुद्धा येत नाही कि ती वस्तू वाळविणे एव्हडी पोखरली असेल कि, छोट्याश्या धक्याने ती लाकडाची वस्तू कोसळून जाते.

याच वाक्प्रचाराचा वापर दिग्दर्शकाने सिनेमाचे नाव ठेवण्यासाठी केला आहे. कथेनुसार असे दिसून येते कि, वर - वर पाहता कधी कधी आपल्यातील नाते सुंदर दिसते पण एकदा का अविश्वास नावाची वाळवी नात्याला लागली किंवा लागलेली असेल तर ते नाते संपुष्टात यायला वेळ लागत नाही कदाचित हेच दिग्दर्शकाला चित्रपटातून सांगायचे आहे.

"वाळवी" हा सिनेमा प्रतिभावान कलाकार, अचूक संपादन आणि निपुण कथानकामुळे संपूर्ण वेळ खेळवून ठेवतो व शेवटी एक संदेशात्मक अनुभव देऊन जातो.

 

  - कृष्णा 

Comments