वाढती महागाई अनैतिक शेती पद्धतीला आमंत्रण: महाआपत्तीचे निमंत्रण

 

 

      आपण रोजच्या जीवनातून, वर्तमानपत्रातून किंवा रोजच्या खरेदी विक्रीतून हे अनुभवत आहोत कि, महागाई वाढत चालली आहे, त्यामुळे दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत आहेत आणि प्रत्येकजण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करत आहेदुर्दैवाने, अधिक पैशांच्या या लालसेपोटी काही व्यक्ती पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या आणि शेतीचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या अनैतिक पद्धतीमध्ये गुंतल्या आहेत.अशा या परिस्थितीमुळे विशेषतः प्रभावित झालेल्या गटांपैकी एक म्हणजे शेतकरी. महागाईने शेतीला मोठा फटका बसला असून, अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकरी वाटेल त्या पद्धतीचा अवलंब करत आहेत,असे काही अभ्यासाअंती दिसून आले आहे. या अनैतिक पद्धतीमध्ये मुख्यत्वे जास्त प्रमाणात कीटकनाशके वापरणे समाविष्ट आहे,ज्यामुळे माती खराब होते आणि ती नापीक बनते. युनायटेड नेशन्सच्या एका अहवालानुसार, दरवर्षी जगामध्ये 24 अब्ज टन सुपीक मातीची नासाडी होत आहे.शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली आहे की ही प्रवृत्ती चालू राहिल्यास, 2050 पर्यंत पृथ्वीवरील 95% भूभाग निकृष्ट होऊ शकतो. ही समस्या  अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यंत गरीब लोकांसाठी फार गंभीर आहे कारण अभ्यासाअंती असे आढळून आले आहे कि.  जमिनीच्या वाढत्या ऱ्हासामुळे आतापर्यंत 3.2 अब्ज लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम झाला आहे.



    FAO, NAS आणि IFPRI सारख्या संस्थांच्या संशोधनानुसार शेतीच्या नापीक होण्यामागे पुढील काही अनैतिक शेती पद्धतीचा जिम्मेदार आहेत जसे कि कीटकनाशकांचा अतिवापर, जलस्रोतांचा अतिवापर त्याच जमिनीवरती वारंवार एकच पीक घेणे, मातीतील पोषक तत्वांचा ऱ्हास होणे. मात्र असेही दिसून आले आहे कि महागाईच्या वाढत्या रेट्यामुळे शेतकरी या पद्धतींचा वापर करण्यास मजबूर  होत आहेत, दिवसागणिक त्यांच्या वरती आर्थिक दबाव वाढत आहे.कुटुंबाच्या  गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक अन्न उत्पादन करण्याची गरज निर्माण होत आहे. यामुळे, जमिनीच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे  आणि जमिनीची उत्पादकता कमी होत आहे.





    मार्च 2023 मध्ये, भारतातील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) ने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की देशातील फळे आणि भाज्यांच्या महत्त्वपूर्ण भागावर प्रतिबंधित कीटकनाशके वापरली जात आहेत. अभ्यासात 14 राज्यांमधील 700 हून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आणि असे आढळून आले की 70% पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये प्रतिबंधित कीटकनाशकांचे अवशेष आहेत.ही कीटकनाशके मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. तसेच बंदी घातलेल्या कीटकनाशकांन विषयी आणि त्याच्या नियमांची कठोर अंमलबजावणी होण्याविषयी शेतकरी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता वाढवण्याची गरज या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे.भारतामध्ये आजमितीस केवळ 20.6% जमीन वनाच्छादित आहे, तर शास्त्रज्ञांनी पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी 33% क्षेत्र जंगलाखाली असण्याची शिफारस केली आहे.वरील सर्व गोष्टीच्या मुळाशी जर पहिले तर अनेक कारणांपैकी महागाई हे एक कारण निस्तीतपणे आहे असे दिसून येते. आपल्या अवती भोवती जणू पैसे कमवण्याची जीव घेणी स्पर्धा सुरु असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आणि या स्पर्धेचे एक मुख्य कारण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा भांडवलशाहीकडे वाढता कल.



    १९९० पासून भारतीय अर्थव्यवस्था हि जलद गतीने भांडवलशाहीकडे जात असल्याचे आपल्याला अनेक शासन निर्णयातून दिसून येईल. मात्र भारतासारख्या विकसनशील देशाने समाजवादाला तिलांजली देऊन केवळ भांडवलशाहीवर अवलंबून राहण्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. भारतासारख्या देशांनी शाश्वततेला प्रोत्साहन देणाऱ्या पर्यायी आर्थिक मॉडेल्सचा विचार केला पाहिजे असे मला मनोमन वाटते. केवळ इच्छा पूर्ती आणि आर्थिक प्रगती यावर विसंबून राहता एक समाज म्हणून आपण आपल्या कृतींचा पर्यावरणावर आणि आपल्या भावी पिढ्यांवर काय परिणाम होतो याचा विचार केला पाहिजे. आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय शास्वतता यांच्यात समतोल राखला पाहिजे, नेहमी सर्व गोष्टींवर अधिक आर्थिक बाजूने  विचार करण्यापेक्षा, सरकार आणि धोरणकर्त्यांनी शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी निर्णायक कृती करणे आवश्यक आहे. जसे कि, वाढत्या महागाईवर वचक ठेवणे, परवडणाऱ्या किमतीत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे. नाहीतर वाढती महागाई आणि त्यातून जन्माला येणारी अनैतिक कृषी पद्धती ही आपणासर्वांवरती मोठी आपत्ती घेऊन येईल यात काही शंका नाही. समाज, सरकार आणि धोरणकर्त्यांनी त्यांच्या कृतींचा पर्यावरणावर आणि भावी पिढ्यांवर काय परिणाम होतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भविष्यातील येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण एक निरोगी, आनंदी आणि सुपीक ग्रह सोडू याची खात्री करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.

                               

                                                                                                                                          - कृष्णा दाभोलकर

Comments