विवाहांतर

 

 विवाह क्षण प्रेमाचा, क्षण स्वप्न पुरतीचा, क्षण आनंदाचा, क्षण एकोप्याचा, क्षण उत्सवाचा.

मानवसमाज गेल्या कित्येक पिढ्या, युगे विवाह हि संस्था जगत आला आहे, भोगत आला आहे. विवाह नावाची संस्था मानवी इतिहासात खोलवर रुजलेली आहे. कालांतराने आवश्यक ते बदल विवाह संस्थेत झालेले आहेत. विवाह संस्थेचा नेमका उगम कधी झाला हे सांगणे कठीण आहे परंतु बहुधा कुटुंबे किंवा जमातीमधील सामाजिक आणि आर्थिक बंध प्रस्थापित करण्याचा एक मार्ग विवाह संस्था म्हणून उदयास आली असावी असे काही संशोधकांचे मत आहे.

विवाह संस्थेत वेळोवेळी बदल होत आले आहेत, कुटुंबातील साध्या करारापासून ते विधी आणि धार्मिक प्रथा यांचा त्यात समावेश आहे.





प्राचीन ग्रीस मध्ये, विवाह हि नागरी बाब मानली जात होत होती, परंतु वर - वधूला आशीर्वाद देण्यासाठी धार्मिक समारंभ देखील आयोजित केले जात होते.

प्राचीन रोम मध्ये, विवाह हा कायदेशीर करार  होता ज्यामध्ये विविध विधींचा समावेश होता .

मध्ययुगीन काळात विवाहाला संस्कार म्हणून परिभाषित करण्यात कॅथॉलिक चर्च ने आणि भारतात पुरोहितांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

काही विचारवंतांच्या मते, राजकीय , आर्थिक किंवा सामाजिक कारणास्तव बहुतेक कुटुंबाद्वारे विवाह आयोजित केले जातात  जोडीदाराच्या निवडीमध्ये प्रेम आणि वैयक्तिक निवड कमी भूमिका बजावते आणि याच काळात हुंडा नावाची संकल्पना निर्माण झाली असावी.

युरोपमध्ये आद्योगिक व सुधारणावादी काळात बरेच सारे लोक व्यक्तिवादाकडे वळले, ज्याचा विवाहाच्या कल्पनेवर काही प्रभाव पडला, लग्न आणि साहचर्य हे लग्नाचे आवश्यक घटक म्हणून पहिले जाऊ लागले.

प्रबोधन युगाने पारंपरिक विवाहांना आव्हान देत परस्पर संमती आणि वैयक्तिक निवडीवर आधारित विवाहाच्या कल्पनेला पुढे प्रोत्साहन दिले.

कायदेशीर सुधारणा आणि धर्मनिरपेक्षतेने हळूहळू विवाहाला अन्य धार्मिक नियंत्रांपासून वेगळे केले.

१९ व्या आणि २० व्या शतकात विवाहावर परिणाम करणारे विविध सामाजिक आणि कायदेशीर बदल झाले. ज्यात स्त्रियांच्या हक्काची मान्यता, घटस्फोटाचे प्रमाण वाढणे आणि आंतरजातीय आणि समलैगिंक विवाहाची स्वीकृती यांचा समावेश आहे.

 


२१ व्य शतकात विवाहसंस्था बदलत आहे. अनेक देशांनी तर समलिंगी विवाहाला मान्यता दिली आहे.

पण आजकाल आपल्या सभोवती विवाह झालेल्या लोकांमध्ये एक धुसफूस, नाराजी, निरासक्ती दिसून येत आहे. हजारो वर्षाचा प्रवास केलेल्या विवाहसंस्थेबद्दल लोकांचं मत वाईट बनत चाललं आहे. वेगवेगळे वळण घेऊन अनेक अडचणींवरती मात करून इथं पर्यंत पोहचलेली विवाह संस्था टप्या टप्याने संपतेय कि काय किंवा तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे काय अशी शंका येते.

लग्न होऊन चारपाच वर्ष किंवा अगदी १० वर्ष सुद्धा झालेल्या प्रत्येक पाच जोडप्यांपैकी एक जोडपे किंवा त्या जोडप्यातील एक सहचारी वैवाहिक आयुष्यात नाराज, निराशावादी झाल्याचे दिसून येत आहे.

माझ्या ऑफिस मधल्या एक तरुण विवाहित महिला सहकाऱ्यांशी विवाह संस्था आणि सध्याची स्थिती यावर माझे बोलणे झाले. त्या संवादातून विवाहसंस्थेविषयी एक गोस्ट अधोरेखित झाली. समाज बदलला, संस्कृती बदलली, लोकांच्या बोली भाषेत बदल झाला, टेकनॉलॉजि बदलली पण लग्नानंतरच मुलीचं आयुष्य अजूनही तसच आहे.


मुलींकडून आजही पारंपारिकपद्धतीच्या अपेक्षा केल्या जातात. मुलाकडून किंवा मुलाच्या आईवडिलांकडून अजूनही मुलींना चूल आणि मुलं याच दृष्टीकोनातून बघितलं जात. पण जसा सामाज जीवनामध्ये बदल झाला तसाच मुलींच्या देखील आयुष्यात बदल झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, कर्मचारी गटात किंवा नोकरी करणाऱ्या गटात महिलांच्या सहभागामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक स्त्रिया करिअर करत आहेत आणि परंपरेने पुरुषांचे वर्चस्व असलेल्या विविध क्षेत्रात योगदान देत आहेत. स्वतः अर्थार्जन करत आहेत, स्वतःच्या आवडी निवडी, भावना व्यक्त करत आहेत.



पण आजही बहुतेकवेळा असे दिसून येते कि, घराबाहेर काम करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या मुलींना अजूनही तेव्हडेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त घरामध्ये कामं करावे लागतात आणि टेकनॉलॉजि कितीही आयुष्यात आली असली तरीही एक गृहिणीला खूप काम असतात पण मला वाटते आता अशी वेळ आली आहे कि घरातील कामे नवरा व्यक्तीने वाटून घेतली पाहिजे, पत्नीला घर कामात मदत केली पाहिजे. महिलांच्या इच्छांना मान दिला पाहिजे, त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. जीवनसाथी या नात्याने सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि घर कामात मदत करून शारिरीक मदत केली पाहिजे. आता असे केले तरच विवाह संस्था टिकेल असे वाटते नाहीतर नवीन तरुण तरुणी विवाह संस्थेला नाकारतील आणि लिव्ह इन पद्धतीला अंगिकारतील असे वाटते

 

- कृष्णा दाभोलकर

 


Comments